तुमच्या मुळे आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक ताकद अनुभवतोयत..- मा.दिशा पिंकी शेख

एकतर डॉ. बाबसाहेबा आंबेडकारानंतर त्यांचं कुणी हयात आहे हे मला 2014 पर्यंत माहित नव्हतं आणि तो पर्यंत बाबासाहेबांनी वंशवारस्याने येणारे नेतृत्व अमान्य केलं होतं, हे अर्धवट ज्ञान घेऊन मी तुम्हाला बाबासाहेबांचे वंश वारसदार इतकं संक्षिप्त पाहत होते..

त्यात नव्याने घडू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे वळू नये म्हणून एक व्यवस्था कसोशीने काम करत होती. तुम्ही उद्दाम आहात, काँग्रेस धार्जिन आहात, तुम्हाला कार्यकर्त्यांची किंमत नाही, हे सारं अस काही रंगवून कानावर पडायचं कि तुमच्या जवळ येऊच नये…

मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर तरुणांशी बोलायला लागले, त्यांना आंबेडकरी नेतृत्वाची गरज समजून सांगायला लागले, पण जेव्हाही मला कुणी म्हणायचं राजकीय भूमिका काय असावी ? या प्रश्नावर मी शांत असायचे. कारण स्वतःला वैचारिक वारसदार आणि आंबेडकरी म्हणवणारे बाबासाहेबांच्या नावावर स्वतःच्या भाकऱ्या भाजताना दिसत होते, आणि तुमच्या विषयी मेंदूत एवढ गैरसमज भरला होता की वाचा तुमचं नाव घ्यायला धजावत नव्हती. अशातच सत्यशोधक विध्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला ऐकून मग मत ठरवण्याचा सल्ला दिला आणि युट्युब वर तुमची आणि प्रतिमा परदेशी मॅम ची मुलाखत दाखवली. तेव्हा तुम्हाला वैचारिक आंबेडकरी वंशज म्हणून स्वीकारायच्या दिशेने मी पहिलं पाऊल टाकलं. मग झपाटल्या सारखी तुमची माहिती भाषण आणि काही तुमच्यावरील लेख वाचले मग मन थोडं तुमच्याकडे झुकायला तयार झालं. अंबेडकर भवन पडल्या नंतर भर पावसात आंबेडकरी विचार आणि संघर्षाचे कवच म्हणून तुम्ही जेव्हा उभे राहिलात तेव्हा तुम्ही अजून जवळचे वाटायला लागलात आणि इतर आंबेडकरी म्हणवणारे जेव्हा बोटचेपी भूमिका घ्यायला लागले तेव्हा त्यांच्या नकली विचारवारस्याचे बुरखे फाटायला लागले. त्यांनी दलालीने बाबासाहेबांचे विचार विक्रीला काढलेत हे लक्षात यायला लागले.. मग मी तुमचं नाव न घेता तुमचं काम करत होते कारण माझ्याकडे अजूनही वंशवारस्याला विरोध करणाऱ्या दांभिक आंबेडकरी म्हणवणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं न्हवती. सोबतच पारंपरिक भीक मागून जगत असल्याने भूमिका घ्यायची भीती वाटत होती. कारण मला भीक देणाऱ्या गटात आंबेडकरी खूप कमी होते पोट सार प्रतिगाम्यांवर होत म्हणून शांत होते..

मी माझ्या परीने यातून निघण्याचा प्रयत्न करत होते. हे प्रयत्न करत असतांनाच भीमा कोरेगाव घडलं, डोळ्यादेखत भीमकोरेगाव जळत होत, लेकरं, बाया रडत होत्या, पुरुष घाबरली होती, म्हातारी मानस वीसवीस किलोमीटर विना अन्न पाण्याचे चालत होते आणि स्वतःला आंबेडकरी म्हणवणारे नेते मच्छी मार्केट मधल्या गोधळाला लाजवतील अशा गोंधळात बाबासाहेबांच्या नावाने आलेल्या अनुयायांच्या आयत्या समूहावर भाषणबाजीतून राजकीय डल्ला मारत होते.. बघता बघता राज्य तणावाखाली आलं आणि तुम्ही बंदाची साद घालून राज्याचं पर्यायाने देशाचं नुकसान वाचवत आंबेडकरी जनतेच संरक्षण केलं तेव्हा तुम्हाला वंशाचे वारसदार म्हणणारा एक पण लाल पुढे आला नाही उलट सरकार धार्जिन भूमिका घेऊन ते वैचारिक वारसदार नाही तर राजकिय दलाल आहेत हे त्यांनी सिद्ध केलं, आणि मी उघड भूमिका घेत या बाजारबसव्याना विरोध करायचे ठरवले, जेव्हा वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली तेव्हा धम्मसंगिनी ताईंनी भूमिके विषयी विचारलं होत. मी भूमिका घेतली होती पण मला राजकारणात यायचं नव्हतं, मी थोडी घाबरत होते अर्थात त्याला बरीच कारण होती . जसं जसं तुम्ही अलुतेदार बलुतेदार भटके अल्पसंख्यकांची मोट बांधायला लागलात माझा तुमच्यावरचा विश्वास आदर वाढत होता आणि या मोटेत मी माझ्या समूहासोबत असावं असं वाटायला लागलं.

नाशिकच्या कार्यकर्त्यांनी मला वंचितच्या स्टेजवर बोलायला बोलावलं आणि पहिल्यांदा कुठल्यातरी राजकीय पक्षाच्या स्टेजवर राजकीय भूमिका घेतली.. पितृसत्तेने पुरुषांना दिलेल्या सत्तास्थानांचा स्त्री स्वातंत्र्यासाठी वापर करणारे पुरुष आणि राजकीय वंशवारश्याने दिलेल्या सत्तास्थानांचा वापर सत्तेच्या सामाजीकरणासाठी करणारे राजकीय वारसदार म्हणून मी हि समीकरण समजून घेऊ लागले तेव्हा मला भूमिका पटायला लागल्या.

अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य छत्रपतींनंतर डॉ. बाबासाहेबांनी वास्तवात आणलं ज्याच्यावर सरंजामी, घराणेशाहीवादी, आणि काही तुकडेतोडू बांडगुळ डल्ला मारायला लागली आणि न राहवून परत आंबेडकरांच्या वरसदारालाच परत सत्तेची लगाम हातात घ्यावी लागली.

स्वातंत्रतोर काळात पहिल्यांदा होलार,कैकाडी, लोकसभा लढवत होते तर माझ्या सारख्या हिजडा समूहाची प्रतिनिधी ज्या समूहाला स्वतःचा राजकीय , सामाजिक आवाजच न्हवता तिला एका राजकीय पक्षाची प्रवक्ता होण्याची संधी मिळाली ती तुमच्यामुळे.. कुठल्याच प्रस्थापित आंबेडकरी, सेक्युलर वैचारिक वारसदाराने मला आणि माझ्या सारख्या वंचित घटकांना मांडीला मांडी लावून बसवलं नसत तुमच्या मुळे आज आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक ताकद अनुभवतोयत.. आमच्या आयुष्यात राजकीय , सामाजिक, स्वलांबनाची, स्वाभिमानाची पहाट तुमच्या मुळे आहे..आज तुमचा वाढदिवस म्हणून आम्हाला आमचा स्वाभिमान दिवस वाटतो.. तुम्ही खूप खूप जगा… अनंत सदिच्छा आणि मंगल कामना… आणि आदराने क्रांतिकारी जय भीम.
चुकभुल माफ असावी…

तुमची कार्यकर्ती
दिशा पिंकी शेख

(प्रस्तुत लेख हा प्रस्तुत लेखिकेच्या FB वॉल वरून सभार घेतला आहे .प्रस्तुत लेखिका वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या आहेत.)

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

तृतीय पंथीय असल्या कारणाने वंचितच्या प्रवक्त्या दिशा शेख याना TV9 ने नाकारले

सोम मे 20 , 2019
Tweet it Pin it Email ज्याने समाजाला दिशा द्यावी आदर्श निर्माण करावा मात्र तोच जर कर्मठ अन खुळचट विचाराने भरकटलेले असतात .नेमके असेच मीडिया चे झाले आहे या मीडियात करणारे पत्रकार आणि त्यांचे संपादक यांनी तर हद्द केली आहे . वंचित कडून याचा निषेध करण्यात आला यो खालील प्रमाणे TV […]

YOU MAY LIKE ..