राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोह-सुरेश सावंत

पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही.


‘भारताचा शोध’ या पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पुस्तकावर आधारित ‘भारत एक खोज’ नावाची मालिका बऱ्याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवर झाली. आता ती यूट्यूबवर उपलब्ध आहे. मालिकेच्या पहिल्या भागात बैलगाडीतून एका गावात नेहरु सभेला चालल्याचा प्रसंग आहे. गाडीसोबतचा जमाव ‘भारतमाता की जय’ तसेच ‘पंडित नेहरु झिंदाबाद’ अशा घोषणा देत आहे. नंतर सभा सुरु होते. सभेत बोलताना नेहरु लोकांना प्रश्न विचारतात- “क्या हमारे पहाड़, नदियां, जंगल, जमीन, वन संपदा, खनिज… यही भारत माता है?” पुढे तेच त्याचे उत्तर देतात – “आप भारत माता की जय का नारा लगाते हैं तो आप हमारे प्राकृतिक संसाधनों की जय ही करते हैं. हिन्दुस्तान एक ख़ूबसूरत औरत नहीं है. नंगे किसान हिन्दुस्तान हैं. वे न तो ख़ूबसूरत हैं, न देखने में अच्छे हैं- क्योंकि ग़रीबी अच्छी चीज़ नहीं है, वह बुरी चीज़ है. इसलिए जब आप ‘भारतमाता’ की जय कहते हैं- तो याद रखिए कि भारत क्या है..”

भारतमातेच्या मुक्तीचा संग्राम चालू असतानाचा हा काळ आहे. भारतमातेच्या अभिमानाने लोक भारावून गेलेले आहेत. लढ्यासाठी एवढे पुरेसे होते. मात्र नेहरु तिथे थांबत नाहीत. भारतमातेचा म्हणजेच राष्ट्राचा खरा अर्थ ते या महासंग्रामावेळीच सांगत आहेत. एखादे राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक सीमांच्या आतला विशिष्ट भूप्रदेश नव्हे. तसेच हा भूप्रदेश मुक्त करणे यातच आपल्या स्वातंत्र्यसंग्रामाचे सार्थक नाही. तर या भूप्रदेशावर राहणारी माणसे, त्यांच्या आकांक्षा म्हणजे राष्ट्र. भूप्रदेश मुक्त तर करावा लागेलच. पण त्यावरील माणसांचे दारिद्र्य, त्यांच्यातील विषमता दूर करुन एक न्याय्य, समतेच्या पातळीवरचा समाज घडवणे हे या मुक्तिसंग्रामाचे महत्वाचे उद्दिष्ट असणार आहे. तरच ते राष्ट्र सुंदर होईल. भारतमाता म्हणजे काय, ती सुंदर कशी होईल याचे खूपच प्रभावी निरुपण या प्रसंगातून होते.

राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नाही, परस्परांत बंधुता-भगिनीभाव व भविष्याविषयीच्या सामायिक आकांक्षा असलेल्या लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र असते, हे आपण पाहिले. मग राष्ट्रवाद म्हणजे काय?..तर या आकांक्षांच्या पूर्ततेसाठीचा विचार, भूमिका यांना राष्ट्रवाद म्हणतात. तो संकुचित असू शकतो, तसेच व्यापक असू शकतो. हिटलरने जर्मन आर्यवंश हाच शुद्ध मानववंश असून तोच जगावर राज्य करायला लायक आहे, असा आक्रमक राष्ट्रवाद जोपासला. या राष्ट्रवादाला अखेर पराभव पत्करावा लागला. पण जर्मनीतील ज्यूंना आणि जगालाही त्याचे प्रचंड भोग भोगावे लागले. भारताचा राष्ट्रवाद व्यापक राहिला आहे. आपण केवळ आपल्यापुरता विचार केला नाही. देश मुक्त होण्याआधीच आपल्यासारख्या पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना एकत्र करुन त्यांची अलिप्त राष्ट्रांची संघटना तयार करण्यात नेहरुंनी पुढाकार घेतला. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे भारताचे प्राचीन काळापासूनचे सूत्र आहे. आधुनिक काळात विनोबा भावेंनी ‘जय जगत’ हा नारा दिला. ‘जय हिंद’ बरोबरच ‘जय जगत’ ही आपल्या देशाची भूमिका आहे.

मग आपल्याला अमूल्या नावाच्या एका १९ वर्षांच्या मुलीने ओवेसींच्या बंगलोरच्या सभेत पाकिस्तान तसेच अन्य देशांच्या झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा त्रास का व्हावा? तिला पोलिसांनी अटक करुन तिच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ‘जग जगत’ म्हणण्यास आपली हरकत नसते. पण पाकिस्तान झिंदाबाद हा आपल्याला आपल्या राष्ट्राशी केलेला द्रोह वाटतो. पाकिस्तानशी आपले राजनैतिक वैर आहे. पण म्हणून त्या देशातील जनतेचे कल्याण व्हावे, ही भूमिका गैर कशी? राजनैतिक वैर राजकीय पातळीवर संपविण्याचा प्रयत्न यशस्वी होईल किंवा न होईल; पण म्हणून ते राष्ट्र म्हणजे त्यातील जनता ही शत्रू मानून तिचे अकल्याण इच्छिणे उचित नाही. आपल्या राष्ट्रवादात ते बसत नाही.

समाजाची मानसिकता, सत्ताधाऱ्यांची भूमिका यांमुळे पोलीस अटकेची कारवाई करतात. पण न्यायालयात हे राजद्रोहाचे खटले सहसा टिकत नाहीत. कारण आपल्या संविधानाने कलम १९ द्वारे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. कलम २१ मध्येही व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो. ही कलमे तयार करताना स्वातंत्र्य व सामाजिक सुधारणांच्या चळवळींतून उत्क्रांत झालेली वैचारिक भूमिका घटना तयार करणाऱ्यांच्या मनात होती. संविधान सभेतील चर्चांमधून ती व्यक्त होते. न्यायालयांनी कलमांबरोबरच या चर्चांचाही आधार घेतलेला आहे. केरळमधील जेनोआ विटनेसेस पंथाच्या मुलांनी शाळेत राष्ट्रगीत म्हटले नाही, म्हणून त्यांना शाळेतून काढण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने १९८६ साली या मुलांच्या बाजूने खटल्याचा निकाल दिला. तो देताना न्यायालय म्हणते –‘राष्ट्रगीत न म्हणता शांत राहणे याने कोणत्याही कायद्याचे हनन होत नाही…आपली परंपरा सहिष्णुता शिकवते. आपले संविधान सहिष्णुता प्रचारते. आपण ती पातळ करुया नको.’

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत ही राष्ट्राची अभिमानाची प्रतीके आहेत. त्यांचा यथोचित मान राखला पाहिजे. त्यासाठी कायदेही झाले आहेत. पण तीच महत्वाची मानणे आणि त्यामागील विचारांचा विसर पडणे हे घातक आहे. आपण ‘भारतमाता की जय’ म्हणू, इतरांना म्हणायला जबरदस्ती करु, जे म्हणणार नाहीत त्यांना मारहाण करु; पण त्या भारतमातेच्या मुलांना भोगावे लागणारे दैन्य, विषमता संपवून त्यांचे खरोखरी बंधुता, मैत्री व परस्पर विश्वासावर आधारलेले नाते तयार करणे हा आपल्या राष्ट्रवादाचा हेतू आपण गमावून बसू.

१९७२ चा १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव होता. त्याचवेळी दलितांवरील अत्याचारही वाढले होते. त्या विरोधात दलित पँथरने आंदोलन छेडले होते. ज्या देशात आमच्यावर अनन्वित अत्याचार होतात, तो देश आम्ही आमचा कसा मानावा, हा त्यांचा सवाल होता. कविता, लेख, भाषणांतून राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्हे यांना आव्हान दिले जात होते. त्यावेळच्या एका कवितेत पँथरचे एक नेते व प्रतिभावान कवी नामदेव ढसाळ म्हणतात- ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे?…कंचा मूलभूत अर्थ स्वातंत्र्याचा?’ दुसरे एक नेते राजा ढाले यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या स्वातंत्र्य दिनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्तच्या विशेषांकात ‘काळा स्वातंत्र्य दिन’ असा लेख लिहिला. त्यात त्यांनी राष्ट्रध्वजाबद्दल अत्यंत निरर्गल भाषा वापरली.

या दोन्ही कृतींमधील भाषेबद्दल अनेकांकडून नाराजी प्रकट झाली. मात्र त्यांच्या त्यामागील हेतूबद्दल कुणाचा आक्षेप नव्हता. सरकारनेही ७१ साली राष्ट्रीय प्रतीकांच्या अवमानाबद्दल कायदा झालेला असतानाही या दोहोंवर काही कठोर कारवाई केली नाही. तत्कालीन राजकीय नेतृत्वाने आपल्या राष्ट्राच्या घडणीतील उण्या बाजू दुरुस्त करण्याकडे ही मंडळी लक्ष वेधत आहेत, ते राष्ट्राचा अवमान करत नसून, राष्ट्राला, भारतमातेला अधिक सुंदर कसे करता येईल हेच ते सांगत आहेत, हे मानले.

घटना एकच पण ती राबवणाऱ्या सत्ताधाऱ्यांची विचारसरणी महत्वाची ठरते, हेच यातून दिसते. म्हणूनच आपली फसगत होऊ नये यासाठी देश व घटना रचणाऱ्यांना अपेक्षित राष्ट्रवाद व राष्ट्रद्रोहासारख्या संकल्पनांच्या मूळ भूमिका जाणून घेणे गरजेचे आहे.

  • सुरेश सावंत, sawant.suresh@gmail.com दैनिक पुण्यनगरी १६/५/२१ सदर लेख प्रकाशित झाला .
  • www.ambedkaree.com च्या वाचकांसाठी आंबेडकरी जेष्ठ नेते,विचारवंत मा सुरेश सावंत यांच्या हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत सभार मा सुरेश सावंत याच्या fb वॉलवरून

Team - www.ambedkaree.com

We follower of Lord Buddha,Chatrapati Shivaji Maharaj, Chatrapati Shahu Maharaj ,Mahatma Jyotiba Phule and Dr.Babasaheb Ambedkar . www.AMBEDKAREE.com created by OURPEOPLE media in 26th Jan 2008 .it's is first online portal of Ambedkaree Movement.

Next Post

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासुन बालकांना वाचविण्यासाठी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचा पुढाकार

सोम मे 17 , 2021
Tweet it Pin it Email अकोला – राज्यात कोरोनामुळे बालक व युवकांना कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. भविष्यात परिस्थिती खूप वाईट होऊन यामुळे प्रत्येकाच्या आयुष्य वेदना दाई असू शकते, अशी शक्यता सर्वांनीच वर्तविली आहे. येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 18 वर्षाखालील बालकांमध्ये विषाणूंचे संक्रमण मोठ्या प्रमाणात […]

YOU MAY LIKE ..