या जगातील सर्व दुःख दूर करण्यासाठी किंवा ते संपूर्ण नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी विविध मार्गाचा अवलंब करुन पाहिला यासाठी महत्वाचे म्हणजे त्यांनी संपूर्ण घरादाराचा त्याग करुन आपल्या राज्यांतील दुःख, त्याग, व गरीबी का आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पृथ्वीतलावर त्यांना असे जाणवले की, जन्म आहे तर मृत्यू सुध्दा आज ना उद्या येणारचं. मृत्यू थांबवण्यासाठी मानव कोणत्याही प्रकारे अघोरी कृत्य करु शकत नाही. मानवाला प्रेम, माया, राग, लोभ, मत्सर, द्वेष या सर्व भावना आहे आणि या भावानांना आवर घालून तसेच शांततेच्या मार्गाने प्रत्येक संकटावर मात करत हे जीवन जगता आले पाहिजे तरचं त्यांचा निभाव लागू शकतो हे जाणून होते. बुध्दांनी सर्व सोडून धान्यसाधना व तपश्चर्येचा मार्ग अनुभवला आणि असे करत असताना बुध्दांना ज्ञान प्राप्त झाले. व तो दिवस वैशाख शुध्द पौर्णिमेचा होता.
बुद्धाचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. याच दिवशी इ.स. पूर्व 528 ला सिध्दार्थ गौतम बुध्दांना बुध्दगया येथे पिंपळ वृक्षाखाली सम्यक संबोधि प्राप्त झाली होती. भगवान बुद्धाला गौतम बुद्ध, सिद्धार्थ, तथातगत व बोधिसत्व या नावानेही सुध्दा ओळखले जाते. बुद्धाचे वडिल कपिलवस्तुचे राजा शुद्धोधन हे होते. त्यांच्या आईचे नाव महामाया देवी असे होते. बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलाचे नाव राहूल होते.
‘वैशाख शुध्द पौर्णिमा’ ही महत्वाची पौर्णिमा ठरली. याच पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती आणि दुःखाचे मुळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग बुध्दांना मिळाला. गौतम बुद्धांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्याच बदलाची पायाभरणी केली होती. त्याकाळी समाजात होणारे अत्याचार, पशूबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध त्यांनी केला. मानव कल्याणाचा उपदेश केला. लोकांमध्ये स्वर्ग आणि नर्क या भंपक गोष्टींबद्दल असलेली भीती त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न देखिल केला. त्यामुळे यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा त्यांनी इतरांनाही उपयोग करु दिला. ते उत्तम मार्गदर्शक आणि महागुरु होते. वेगवेगळ्या ठिकाणी आपणांस मिळालेल्या ज्ञानाचा विचार करीत असतांना हे ज्ञान कोणाला द्यावे आणि हे ज्ञान मानवाला देऊ की, नको असे त्यांचे मन त्यांना विचारीत होते. त्यांनी त्यांच्या मनाशी निश्चय केला व ठरविले की, हे ज्ञान आपण माणसाला दिले पाहिजे कारण जग हे अंधारात आहे, जगाला ज्ञानाचा प्रकाश दिलाच पाहिजे. ‘ज्ञान म्हणजे प्रकाश’ अशी बुध्दांची महत्तवाची शिक्षणाची संकल्पना होती. म्हणून सारनाथ येथे तथागतांनी पाच भिक्षुंना बौध्द धम्मांच्या वैज्ञानिक दृष्टीची शिदोरी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी विनामुल्य बहाल केली त्याचप्रमाणे त्याकाळातील शिष्यांनीही आपल्या गुरुचा हा वारसा कायम जपला. म्हणनूच भारत व भारताच्या शेजारील राष्ट्रांना बौध्द तत्वज्ञानाचा मोठा इतिहास विविध बौध्दस्तुप, लेण्या, शिल्प इत्यादीतुन आजही बघायला मिळत आहे. व हेच शिल्प बौध्द लेण्या आपण जतन करणे ही सर्वाधिक काळाची गरज सुध्दा आहे.
बौध्द तत्वज्ञानाचा हा वारसा राजा सम्राट अशोकांनी पुढे चालविला व तेच सम्यक विचार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या धम्म बांधवांना दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 मे 1950 रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवनकार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही तेथे उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची खर्या अर्थाने सुरुवात झाली.
दिल्लीनंतर महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात. आज भारत देशाप्रमाणेच नेपाळ, चीन, जपान, लायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोलिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया अशा अनेक देशात बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
बुध्द जयंतीचे औचित्य साधून समाजातील सर्व मानव जातीने सम्यक व शांततेच्या मार्ग अवलंबून आपले कार्य करणे गरजेचे आहे. व बुध्दांचे विचार तसेच त्यांचे कार्य हे आज सर्व पिढीला समजणे गरजेचे आहे. त्यामुळे हाच वारसा 21 व्या शतकातील नव्या येणार्या पिढीने दुसर्या पिढीला दिला तर बुध्द धम्म हा मानवी जीवनाचा उत्कर्षाचा केंद्रबिंदू ठरेल. म्हणूनच येणार्या पिढीला योग्य त्या रितीने मार्गदर्शन करणे हे सर्व उपासकांचे काम आहे.
चला तर मग महाकारुणि तथागत भगवान गौतम बुध्द यांचा 2563 वा जयंती उत्सव आपण साजरा करु आणि सर्वांना त्यांचे विचार पटवून सांगू. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी सर्वांनीच करुया.
तथागत म्हणजे काय?
तथ म्हणजे सत्य आणि गत म्हणजे मार्ग. जो सत्याच्या मार्गाने जातो. तो ‘तथागत’.. आणि ‘भगवान’ म्हणजे काय? तर ‘भग’ म्हणजे तृष्णा, तहान आणि ‘वात’ म्हणजे ‘स्वार’ होते. जिवनातील तृष्णेवर विजय मिळवुन त्यावर ‘स्वार’ होणार्यास भगवान म्हटले जाते. यामुळे गौतम बुध्द हे भगवान ठरले आणि तथागत ही बनले. यामुळेचं बुध्दास तथागत, भगवान अशी उपाधी लावली जाते. निदान तथागताचा मार्ग स्विकारला तरीही ‘धम्म’ कळला असे आपण म्हणू शकता. हा बुध्द विचार सार्या जगात पसरुया.
-वृषाली पवार
(वृत्तपत्र स्तंभ लेखिका)
vpawar678@gmail.com