भोतमांगे गेले, न्यायाचं काय❓-काही प्रश्न अनुत्तरीत……!
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावात भैय्यालाल भोतमांगे २००६ नुसार, १८ वर्षापुर्वा राहायला आले होते. तिथे त्यांनी साडेपाच एकर शेत जमीन घेतली. ती जमीन महसूल विभागाच्या नोंदीत भैय्यालाल भोतमांगे यांच्या नांवे करण्यास जातीयवादी गावकर्यांचा विरोध झाला. त्यानंतर त्यांच्या जमीनीतून रस्ता मागायला सुरुवात झाली. धुसाळ गावचे पोलिस पाटील सिद्धार्थ गजभिये सुरेखा भोतमांगे यांच्या नात्यातील. त्यांचे भोतमांगे यांच्या घरी येण जाण असे. त्यातच सकरु बिंजेवार आणि सिद्धार्थ गजभिये यांच्यात मजूरीच्या पैशावरुन वाद झाले, त्यावेळी सकरु बिजेवार यांना मारहाण झाली. त्याचा बदला म्हणून ३ सप्टेंबर २००६ रोजी सिद्धार्थ गजभिये यांच्यावर खैरलांजी गावांतील काही लोकांनी हल्ला केला. त्या हल्याची साक्ष सुरेखा भोतमांगे व प्रियांका भोतमांगे यांनी दिली. २९ सप्टेंबर २००६ रोजी हल्लेखोरांची कोर्टासमोर सुनावणी होऊन, त्यांना जामीन मंजूर झाला अन् त्याचं संध्याकाळी माणूसकीला काळिमा फासणारे प्रकरण घडले, जातीयवाद्यांकडून भैय्यालाल भोतमांगेचे कुटुंब संपविण्यात आले. मात्र भैय्यालाल भोतमांगे त्यावेळी घरी नव्हते म्हणून वाचले होते. खैरलांजी प्रकरणांने महाराष्ट्रचं नव्हे तर सारा देश हादरुन गेला. अशी त्याची क्रूरता आणि दाहकता होती. अशा ह्रदयद्रावक प्रकरणात उच्च वर्गाच्या मनातील सल भोतमांगे परिवाराला निर्वंश करुनचं शांत झाली. खैरलांजी रक्तलांच्छित भयानक हत्याकांड मानवी समाज मनाला धक्कादायक ठरले. त्या भयावह घटनेला २९ सप्टेंबर २०१९ रोजी १३ वर्षे पुर्ण झाली आणि ज्यांने आपल्या पत्नीचा, मुलीचा व दोन मुलांचे छिन्न विछिन्न नग्न मृतदेह आपल्या डोळ्यांनी पाहिले ते भैय्यालाल भोतमांगे १० वर्षे न्यायासाठी एकाकी लढा देत, संघर्ष करत असतांनाचं २० जानेवारी २०१७ रोजी त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
भैय्यालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा ( ४५ ), मुलगी प्रियांका ( १७ ) व मुले रोशन ( २१ ) आणि सुधीर यांचे अमानुष हत्याकांड घडले. *अखिल भारतीय सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार* मृत्यूपुर्वी सर्वांची गावातील रस्त्यावरुन धिंड काढण्यात आली. *वृत्तपत्रांच्या अहवालानुसार* दोन्ही मुलांना आई – बहिणीशी अतिप्रसंग करण्यास फर्माविण्यात आले, मुलांनी विरोध केला म्हणून त्यांची गुप्तेंद्रिये छिन्नविछिन्न करण्यात आली. सुरेखा व प्रियांका यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आले, काही अहवालानुसार मृतदेहांवर सुध्दा बलात्कार केले गेले. एवढेचं नव्हे तर, त्यांच्या गुप्तांगात काठ्याही सरकविण्यात आल्या. माणूसकीच्या सर्व मर्यादा ओलांडून त्यांच्यावर निघृणपणे सैतानी, अमानवी कृत करुन, ते निष्पाप मृतदेह बैलगाडीतून दूर कालव्यात फेकून दिले. असा भयानक, रानटीपणाचा कळस माणूसकीला तरी शोभणारा होता का ?
बलात्काराला सामोर्या गेलेल्या महिलेच्या गुप्तांगाच्या परिक्षणासाठी कापसाच्या बोळ्यांने नमुने घेणे हि न्याय वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक असते. खैरलांजी प्रकरणी बलात्कार झाल्याची मृत्यूनंतरची वैद्यकीय तपासणी केली गेली नाही तसेच त्यांचे कपडे न्याय वैद्यकीय तपासणीसाठी शोधले गेले नाहित. घटनास्थळी मृतदेह छिन्नविछिन्न आणि नग्न असूनही व्हिडीओ चित्रीकरण केले गेले नाही. त्यातचं, बलात्कार झाले होते हे सिद्ध करणारे पुरावे देण्यात पोस्टमार्टेम अहवालही अपयशी ठरले. एवढे भयावह प्रकरण घडून सुध्दा अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही नोंदवला गेला नाही. १ अॉक्टोबर २००६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून १२ काठ्या आणि सायकलच्या ८ चेन जप्त करण्यात आल्या. २७ डिसेंबरला आरोपपत्र भंडारा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. ४ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ३६ जणांच्या साक्षी नोंदवून घेण्यात आल्या. त्यापैकी महादेव झंझाळ हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाल्यांने त्याला न्यायालयाने ३ महिण्यांची शिक्षाही दिली. १५ सप्टेंबर २००८ रोजी भंडारा सत्र न्यायालयांने खून, पुरावा नष्ट करणे, बेकायदेशीररित्या जमाव व दंगा करणे या आरोपांखाली ८ आरोपींना दोषी ठरविले.
खैरलांजी प्रकरणी सीबीआयने ४७ जणांना आरोपी केले होते. त्यापैकी ३६ जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त करुन, ११ आरोपींवर खटला चालविण्यात आला. परंतु त्यातील अजून तिघांना निर्दोष मुक्त करण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे असतांना तपासामध्ये दिरंगाई, विसंगती आणि राजकीय पक्षपातामुळे क्रूर, निर्दयी, माणूसकीला कलंकित करणार्या खैरलांजी प्रकरणी उच्च न्यायालयाचा निकाल अनपेक्षित लागला. खूप नियोजन करुन हा कट घडवून आणला. *या घटनेनंतर पुरावे दडपून टाकणे यात विशिष्ट जातीय शक्ती, राजकारणी व शासनकर्ते यांचा हात आहे असा अहवाल नोव्हेंबर २००६ मध्ये यशदाने दिला.
भोतमांगे हत्याकांड प्रकरणी जलद न्यायालयाने ८ पैकी ६ आरोपींना फाशी तर, २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जलद न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत वाढ करावी म्हणून उच्च न्यायालयात गेलेल्या सीबीआयला जोरदार धक्का बसला. सर्व आरोपींना अधिकाधिक कठोर शिक्षा देण्यासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्यात प्रशासन कमी पडले काय माहित नाही. पण, जलद न्यायालयाने या प्रकरणात सहा आरोपींना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करुन, जन्मठेपेवर आणण्यात आली तर, अन्य दोघांना मिळालेल्या जन्मठेपेचे रुपांतर फाशीत करावे ही मागणी अमान्य करुन, उच्च न्यायालयांने त्यांची मुळ शिक्षाचं कायम ठेवली. याचा अर्थ, शिक्षा वाढली नाही तर कमी झाली. खैरलांजी प्रकरणाला एक सामाजिक अंगही असल्याने निकाला विषयी नाराजी व्यक्त होणे साहजीकचं आहे. नाराजीचा विचार करता, न्यायालयीन निर्णयाचाही आदर ठेवला पाहिजे. कारण कोणतेही न्यायालय निर्णय देते ते आपल्या समोर आलेल्या पुराव्यांवरच. पुरावा किती सबळ आणि अचूक, ठोस आहेत यावर निकाल अवलंबून असतो. खैरलांजी घटनेचा आणि नंतरचा क्रम पाहिला तर, अनेक बदल होत गेले. एकाकडून दुसर्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसर्याकडे तपास फिरत गेला. तपास यंत्रणेत महत्वाचे काम करणार्या अनेकांच्या ऐनवेळी बदल्या झाल्या. काही जण निवृत्त झाले तर, काही जण निलंबीत झाले. पण ज्या माणसाचे ज्या प्रकारे कुटुंब उध्वस्त झाले, वंश संहार झाले त्याचं खैरलांजी गावांला तंटामुक्ती गावाचा पुरस्कारही जाहीर झाला होता. ( ? )
भैय्यालाल भोतमांगे आणि जागृत जनतेमुळे खैरलांजी प्रकरण उजेडात आले. १ नोव्हेंबर २००६ रोजी भंडार्यात पहिला मोर्चा निघाला व नंतर सर्वत्र मोर्चे निघू लागले. त्यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी दडपशाहीचे मार्ग अवलंबून, आंदोलकांचा खरपूचं समाचार घेतला गेला. आंदोलनामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचेही वक्तव्य तत्कालीन गृहमंत्र्यांनी केले होते. तर, तब्बल सव्वा महिण्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री खैरलांजीला जाऊन, प्रकरण सीबीआयकडे सोपवून, वारसाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
उच्च न्यायालयांने दिलेल्या निर्णया विरोधात सर्व आरोपींना फाशी होण्यासाठी, योग्य न्याय मिळण्यासाठी भैय्यालाल भोतमांगे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तिथे तरी सीबीआयने अधिक भक्कम पुराव्यासह लढून, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशी त्यांना अपेक्षा होती, पण १० वर्षांनंतरही भैय्यालाल भोतमांगेंना न्याय न मिळताचं, त्यांनाचं अखेरचा श्वास घ्यावा लागला… अशा भयानक हत्याकांडानंतर, भैय्यालाल भोतमांगे कसे जगले असतील ? कसा संघर्ष, लढा दिला असेल याचा विचारही करवत नाही. पण आता भैय्यालाल भोतमांगेही गेले, न्यायाचं कायं ❓
– मिलिंद कांबळे, चिंचवलकर